ग्रामीण कथाकार पांडूरंग काशिनाथ पतंगे यांचे निधन
तळमावले/वार्ताहर
कुंभारगांव (ता.पाटण) येथील पांडूरंग काशिनाथ पतंगे यांचे बुधवार दि.18 ऑक्टोबर, 2023 रोजी निधन झाले. त्यांचे वय 83 वर्षे होते. ‘आप्पा’ या नावाने ते परिसरात परिचित होते. पांडूरंग या स्वतःच्या नावातील ‘रंग’ आणि वडिलांच्या काशिनाथ या नावातील ‘नाथ’ हा शब्द असे ‘रंगनाथ’ पतंगे या नावाने ते लेखन करीत होते.
रंगनाथ पतंगे हे उत्कृ ग्रामीण कथा लिहीत. कुंभारगांव येथे झालेल्या साहित्य संमेलनात त्यांचा गौरव झाला होता. नामवंत दिवाळी अंकामधून त्यांच्या कथा प्रसिध्द झाल्या होत्या. परिसरातील अनेक दिवाळी अंकांना ते विनामूल्य कथा देत असत. त्यांच्या लेखनाचा एक वाचक वर्ग तयार झाला होता. त्यांच्या अनेक कथांना विविध पारितोषिके मिळाली आहेत. त्यांची भाशाशैली काळजाला हात घालणारी अशी होती. जुन्या काळात घडलेल्या अनेक घटनांचे प्रतिबिंब त्यांच्या कथांमधून वाचायला मिळत असे. गेले काही दिवसापासून ते आजारी होते. परंतू त्यांचा लिहण्याचा व्यासंग प्रचंड होता. 200 पेक्षा जास्त कथा त्यांनी लिहल्या आहेत. आकाशवाणीवरही त्यांच्या लिखाणाचे वाचन झाले आहे.
कुंभारगांव येथे के.एन.पतंगे या नावाने त्यांनी कपडयाचा व्यवसाय केला असून पतंगे यांची तिसरी पिढी या व्यवसायात आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या घरी तीन भाऊ, पत्नी, दोन विवाहित मुली आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांचा रक्षाविसर्जन विधी शुक्रवार दि. 20 ऑक्टोबर, 2023 रोजी सकाळी 9.00 वाजता कुंभारगांव, ता.पाटण, जि.सातारा येथे घेण्यात येणार आहे. मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments
Post a Comment